मनाचे श्लोक – भाग १०

/ बालसंस्कार

॥जय जय रघुवीर समर्थ ॥

नको वीट मानूं रघुनायकाचा।
अती आदरे बोलिजे राम वाचा॥
न वेंचे मुखी सांपडे रे फुकाचा।
करीं घोष त्या जानकीवल्लभाचा॥९१॥

अती आदरें सर्वही नामघोषे।
गिरीकंदरी जाइजे दूरि दोषें॥
हरी तिष्ठतू तोषला नामघोषें।
विशेषें हरामानसीं रामपीसें॥९२॥

जगीं पाहतां देव हा अन्नदाता।
तया लागली तत्त्वता सार चिंता॥
तयाचे मुखी नाम घेता फुकाचे।
मना सांग पां रे तुझे काय वेंचे॥९३॥

तिन्ही लोक जाळुं शके कोप येतां।
निवाला हरु तो मुखे नाम घेतां॥
जपे आदरें पार्वती विश्वमाता।
म्हणोनी म्हणा तेंचि हे नाम आतां॥९४॥

अजामेळ पापी वदे पुत्रकामे।
तया मुक्ति नारायणाचेनि नामें॥
शुकाकारणे कुंटणी राम वाणी।
मुखें बोलतां ख्याति जाली पुराणीं॥९५॥

महाभक्त प्रल्हाद हा दैत्यकूळीं।
जपे रामनामावळी नित्यकाळीं॥
पिता पापरुपी तया देखवेना।
जनी दैत्य तो नाम मुखे म्हणेना॥९६॥

मुखी नाम नाहीं तया मुक्ति कैंची।
अहंतागुणे यातना ते फुकाची॥
पुढे अंत येईल तो दैन्यवाणा।
म्हणोनि म्हणा रे म्हणा देवराणा॥९७॥

हरीनाम नेमस्त पाषाण तारी।
बहु तारीले मानवी देहधारी॥
तया रामनामीं सदा जो विकल्पी।
वदेना कदा जीव तो पापरूपी॥९८॥

जगीं धन्य वाराणसी पुण्यराशी।
तयेमाजि आतां गतीं पूर्वजांसी॥
मुखे रामनामावळी नित्य काळीं।
जिवा हित सांगे सदा चंद्रमौळी॥९९॥

यथासांग रे कर्म तेंहि घडेना।
घडे धर्म तें पुण्य गांठी पडेना॥
दया पाहतां सर्व भुतीं असेना।
फुकाचे मुखी नाम तेंही वसेना॥१००॥

॥जय जय रघुवीर समर्थ ॥

Share this Post