मनाचे श्लोक – भाग १२

/ बालसंस्कार

॥जय जय रघुवीर समर्थ ॥

हिताकारणे बोलणे सत्य आहे।
हिताकारणे सर्व शोधुनि पाहें॥
हितकारणे बंड पाखांड वारी।
तुटे वाद संवाद तो हीतकारी॥१११॥

जनीं सांगतां ऐकता जन्म गेला।
परी वादवेवाद तैसाचि ठेला॥
उठे संशयो वाद हा दंभधारी।
तुटे वाद संवाद तो हीतकारी॥११२॥

जनी हीत पंडीत सांडीत गेले।
अहंतागुणे ब्रह्मराक्षस जाले॥
तयाहून व्युत्पन्न तो कोण आहे।
मना सर्व जाणीव सांडुनि राहे॥११३॥

फुकाचे मुखी बोलतां काय वेचे।
दिसंदीस अभ्यंतरी गर्व सांचे॥
क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे।
विचारे तुझा तूंचि शोधुनि पाहे॥११४॥

तुटे वाद संवाद तेथें करावा।
विविके अहंभाव हा पालटावा॥
जनीं बोलण्यासारिखे आचरावें।
क्रियापालटे भक्तिपंथेचि जावे॥११५॥

बहू शापिता कष्टला अंबऋषी।
तयाचे स्वये श्रीहरी जन्म सोशी॥
दिला क्षीरसिंधु तया ऊपमानी।
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी॥११६॥

धुरू लेकरु बापुडे दैन्यवाणे।
कृपा भाकितां दीधली भेटी जेणे॥
चिरंजीव तारांगणी प्रेमखाणी।
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी॥११७॥

गजेंदु महासंकटी वास पाहे।
तयाकारणे श्रीहरी धांवताहे॥
उडी घातली जाहला जीवदानी।
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी॥११८॥

अजामेळ पापी तया अंत आला।
कृपाळूपणे तो जनीं मुक्त केला॥
अनाथासि आधार हा चक्रपाणी।
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी॥११९॥ विधीकारणे जाहला मत्स्य वेगीं।
धरी कूर्मरुपे धरा पृष्ठभागी।
जना रक्षणाकारणे नीच योनी।
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी॥१२०॥

॥जय जय रघुवीर समर्थ ॥

Share this Post