मनाचे श्लोक – भाग १३

/ बालसंस्कार

॥जय जय रघुवीर समर्थ ॥

महाभक्त प्रल्हाद हा कष्टवीला।
म्हणोनी तयाकारणे सिंह जाला॥
न ये ज्वाळ वीशाळ संनधि कोणी।
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी॥१२१॥

कृपा भाकिता जाहला वज्रपाणी।
तया कारणें वामनू चक्रपाणी॥
द्विजांकारणे भार्गवू चापपाणी।
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी॥१२२॥

अहल्येसतीलागी आरण्यपंथे।
कुडावा पुढे देव बंदी तयांते॥
बळे सोडितां घाव घालीं निशाणी।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥१२३॥

तये द्रौपदीकारणे लागवेगे।
त्वरे धांवतो सर्व सांडूनि मागें॥
कळीलागिं जाला असे बौद्ध मौनी।
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी॥१२४॥

अनाथां दिनांकारणे जन्मताहे।
कलंकी पुढे देव होणार आहे॥
तया वर्णिता शीणली वेदवाणी।
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी॥१२५॥

जनांकारणे देव लीलावतारी।
बहुतांपरी आदरें वेषधारी॥
तया नेणती ते जन पापरूपी।
दुरात्मे महानष्ट चांडाळ पापी॥१२६॥

जगीं धन्य तो रामसूखें निवाला।
कथा ऐकतां सर्व तल्लीन जाला॥
देहेभावना रामबोधे उडाली।
मनोवासना रामरूपीं बुडाली॥१२७॥

मना वासना वासुदेवीं वसों दे।
मना कामना कामसंगी नसो दे॥
मना कल्पना वाउगी ते न कीजे।
मना सज्जना सज्जनी वस्ति कीजे॥१२८॥

गतीकारणे संगती सज्जनाची।
मती पालटे सूमती दुर्जनाची॥
रतीनायिकेचा पती नष्ट आहे।
म्हणोनी मनाऽतीत होवोनि राहे॥१२९॥ मना अल्प संकल्प तोही नसावा।
सदा सत्यसंकल्प चित्तीं वसावा॥
जनीं जल्प वीकल्प तोही त्यजावा।
रमाकांत एकान्तकाळी भजावा॥१३०॥

॥जय जय रघुवीर समर्थ ॥

Share this Post