मनाचे श्लोक – भाग १६

/ बालसंस्कार

॥जय जय रघुवीर समर्थ ॥

खरें शोधितां शोधितां शोधिताहे।
मना बोधिता बोधिता बोधिताहे॥
परी सर्वही सज्जनाचेनि योगे।
बरा निश्चयो पाविजे सानुरागे॥१५१॥

बहूतांपरी कूसरी तत्त्वझाडा।
परी अंतरी पाहिजे तो निवाडा॥
मना सार साचार ते वेगळे रे।
समस्तांमधे एक ते आगळे रे॥१५२॥

नव्हे पिंडज्ञाने नव्हे तत्त्वज्ञाने ।
समाधान कांही नव्हे तानमाने॥
नव्हे योगयागें नव्हे भोगत्यागें।
समाधान ते सज्जनाचेनि योगे॥१५३॥

महावाक्य तत्त्वादिके पंचकर्णे।
खुणे पाविजे संतसंगे विवर्णे॥
द्वितीयेसि संकेत जो दाविजेतो।
तया सांडुनी चंद्रमा भाविजेतो॥१५४॥

दिसेना जनी तेचि शोधुनि पाहे।
बरे पाहता गूज तेथेचि आहे॥
करी घेउ जाता कदा आढळेना।
जनी सर्व कोंदाटले ते कळेना॥१५५॥

म्हणे जाणता तो जनी मूर्ख पाहे।
अतर्कासि तर्की असा कोण आहे॥
जनीं मीपणे पाहता पाहवेना।
तया लक्षितां वेगळे राहवेना॥१५६॥

बहू शास्त्र धुंडाळता वाड आहे।
जया निश्चयो येक तोही न साहे॥
मती भांडती शास्त्रबोधे विरोधें।
गती खुंटती ज्ञानबोधे प्रबोधे॥१५७॥

श्रुती न्याय मीमांसके तर्कशास्त्रे।
स्मृती वेद वेदान्तवाक्ये विचित्रे॥
स्वये शेष मौनावला स्थीर पाहे।
मना सर्व जाणीव सांडून राहे॥१५८॥

जेणे मक्षिका भक्षिली जाणिवेची।
तया भोजनाची रुची प्राप्त कैची॥
अहंभाव ज्या मानसीचा विरेना।
तया ज्ञान हे अन्न पोटी जिरेना॥१५९॥

नको रे मना वाद हा खेदकारी।
नको रे मना भेद नानाविकारी॥
नको रे मना शीकवूं पूढिलांसी।
अहंभाव जो राहिला तूजपासी॥१६०॥

॥जय जय रघुवीर समर्थ ॥

Share this Post