मनाचे श्लोक – भाग १७

/ बालसंस्कार

॥जय जय रघुवीर समर्थ ॥

अहंतागुणे सर्वही दुःख होते।
मुखे बोलिले ज्ञान ते व्यर्थ जाते॥
सुखी राहता सर्वही सूख आहे।
अहंता तुझी तुंचि शोधुन पाहे॥१६१॥

अहंतागुणे नीति सांडी विवेकी।
अनीतीबळे श्लाघ्यता सर्व लोकी॥
परी अंतरी अर्वही साक्ष येते।
प्रमाणांतरे बुद्धि सांडूनि जाते॥१६२॥

देहेबुद्धिचा निश्चयो दृढ जाला।
देहातीत ते हीत सांडीत गेला॥
देहेबुद्धि ते आत्मबुद्धि करावी।
सदा संगती सज्जनाची धरावी॥१६३॥

मनें कल्पिला वीषयो सोडवावा।
मनें देव निर्गूण तो ओळखावा॥
मनें कल्पिता कल्पना ते सरावी।
सदा संगती सज्जनाची धरावी॥१६४॥

देहादीक प्रपंच हा चिंतियेला।
परी अंतरी लोभ निश्चित ठेला॥
हरीचिंतने मुक्तिकांता करावी।
सदा संगती सज्जनांची धरावी॥१६५॥

अहंकार विस्तारला या देहाचा।
स्त्रियापुत्रमित्रादिके मोह त्यांचा॥
बळे भ्रांति हें जन्मचिंता हरावी।
सदा संगती सज्जनांची धरावी॥१६६॥

बरा निश्चयो शाश्वताचा करावा।
म्हणे दास संदेह तो वीसरावा॥
घडीने घडी सार्थकाची धरावी।
सदा संगती सज्जनांची धरावी॥१६७॥

करी वृत्ती जो संत तो संत जाणा।
दुराशागुणे जो नव्हे दैन्यवाणा॥
उपाधी देहेबुद्धीते वाढवीते।
परी सज्जना केविं बाधु शके ते॥१६८॥

नसे अंत आनंत संता पुसावा।
अहंकारविस्तार हा नीरसावा॥
गुणेवीण निर्गुण तो आठवावा।
देहेबुद्धिचा आठवु नाठवावा॥१६९॥

देहेबुद्धि हे ज्ञानबोधे त्यजावी।
विवेके तये वस्तुची भेटी घ्यावी॥
तदाकार हे वृत्ति नाही स्वभावे।
म्हणोनी सदा तेचि शोधीत जावे॥१७०॥

॥जय जय रघुवीर समर्थ ॥

Share this Post