मनाचे श्लोक – भाग १८

/ बालसंस्कार

॥जय जय रघुवीर समर्थ ॥

असे सार साचार तें चोरलेसे।
इहीं लोचनी पाहता दृश्य भासे॥
निराभास निर्गुण तें आकळेना।
अहंतागुणे कल्पिताही कळेना॥१७१॥

स्फुरे वीषयी कल्पना ते अविद्या।
स्फुरे ब्रह्म रे जाण माया सुविद्या॥
मुळीं कल्पना दो रुपें तेचि जाली।
विवेके तरी स्वस्वरुपी मिळाली॥१७२॥

स्वरुपी उदेला अहंकार राहो।
तेणे सर्व आच्छादिले व्योम पाहो॥
दिशा पाहतां ते निशा वाढताहे।
विवेके विचारे विवंचुनि पाहे॥१७३॥

जया चक्षुने लक्षिता लक्षवेना।
भवा भक्षिता रक्षिता रक्षवेना॥
क्षयातीत तो अक्षयी मोक्ष देतो।
दयादक्ष तो साक्षिने पक्ष घेतो॥१७४॥

विधी निर्मिती लीहितो सर्व भाळी।
परी लीहिता कोण त्याचे कपाळी॥
हरू जाळितो लोक संहारकाळी।
परी शेवटी शंकरा कोण जाळी॥१७५॥

जगी द्वादशादित्य हे रुद्र अक्रा।
असंख्यात संख्या करी कोण शक्रा॥
जगी देव धुंडाळिता आढळेना।
जगी मुख्य तो कोण कैसा कळेना॥१७६॥

तुटेना फुटेना कदा देवराणा।
चळेना ढळेना कदा दैन्यवाणा॥
कळेना कळेना कदा लोचनासी।
वसेना दिसेना जगी मीपणासी॥१७७॥

जया मानला देव तो पुजिताहे।
परी देव शोधुनि कोणी न पाहे॥
जगी पाहता देव कोट्यानुकोटी।
जया मानली भक्ति जे तेचि मोठी॥१७८॥

तिन्ही लोक जेथूनि निर्माण झाले।
तया देवरायासि कोणी न बोले॥
जगीं थोरला देव तो चोरलासे।
गुरूवीण तो सर्वथाही न दीसे॥१७९॥

गुरु पाहता पाहता लक्ष कोटी।
बहूसाल मंत्रावळी शक्ति मोठी॥
मनी कामना चेटके धातमाता।
जनी व्यर्थ रे तो नव्हे मुक्तिदाता॥१८०॥

॥जय जय रघुवीर समर्थ ॥

Share this Post