मनाचे श्लोक – भाग १९

/ बालसंस्कार

॥जय जय रघुवीर समर्थ ॥

नव्हे चेटकी चाळकू द्रव्यभोंदु।
नव्हे निंदकू मत्सरू भक्तिमंदू॥
नव्हे उन्मतू वेसनी संगबाधू।
जनी ज्ञानिया तोचि साधु अगाधू॥१८१॥

नव्हे वाउगी चाहुटी काम पोटी।
क्रियेवीण वाचाळता तेचि मोठी॥
मुखे बोलिल्यासारिखे चालताहे।
मना सद्गुरु तोचि शोधुनि पाहे॥१८२॥

जनी भक्त ज्ञानी विवेकी विरागी।
कृपाळु मनस्वी क्षमावंत योगी॥
प्रभु दक्ष व्युत्पन्न चातुर्य जाणे।
तयाचेनि योगे समाधान बाणे॥१८३॥

नव्हे तोचि जाले नसे तेचि आले।
कळो लागले सज्जनाचेनि बोले॥
अनिर्वाच्य ते वाच्य वाचे वदावे।
मना संत आनंत शोधीत जावे॥१८४॥

लपावे अति आदरे रामरुपी।
भयातीत निश्चीत ये स्वस्वरुपी॥
कदा तो जनी पाहतांही दिसेना।
सदा ऐक्य तो भिन्नभावे वसेना॥१८५॥

सदा सर्वदा राम सन्नीध आहे।
मना सज्जना सत्य शोधुन पाहे॥
अखंडीत भेटी रघूराजयोगू।
मना सांडीं रे मीपणाचा वियोगू॥१८६॥

भुते पिंड ब्रह्मांड हे ऐक्य आहे।
परी सर्वही स्वस्वरुपी न साहे॥
मना भासले सर्व काही पहावे।
परी संग सोडुनि सुखी रहावे॥१८७॥

देहेभान हे ज्ञानशस्त्रे खुडावे।
विदेहीपणे भक्तिमार्गेचि जावे॥
विरक्तीबळे निंद्य सर्वै त्यजावे।
परी संग सोडुनि सुखी रहावे॥१८८॥

मही निर्मिली देव तो ओळखावा।
जया पाहतां मोक्ष तत्काळ जीवा॥
तया निर्गुणालागी गूणी पहावे।
परी संग सोडुनि सुखे रहावे॥१८९॥ नव्हे कार्यकर्ता नव्हे सृष्टिभर्ता।
पुरेहून पर्ता न लिंपे विवर्ता॥
तया निर्विकल्पासि कल्पित जावे।
परि संग सोडुनि सुखे रहावे॥१९०॥

॥जय जय रघुवीर समर्थ ॥

Share this Post