मनाचे श्लोक – भाग ९

/ बालसंस्कार

॥जय जय रघुवीर समर्थ ॥

मना मत्सरे नाम सांडूं नको हो।
अती आदरे हा निजध्यास राहो॥
समस्तांमधे नाम हे सार आहे।
दुजी तूळणा तूळितांही न साहे॥८१॥

बहु नाम या रामनामी तुळेना।
अभाग्या नरा पामरा हे कळेंना॥
विषा औषधा घेतले पार्वतीशे।
जिवा मानवा किंकरा कोण पुसे॥८२॥

जेणे जाळिला काम तो राम ध्यातो।
उमेसी अती आदरें गूण गातो॥
बहु ज्ञान वैराग्य सामर्थ्य जेथें।
परी अंतरी नामविश्वास तेथें॥८३॥

विठोने शिरी वाहिला देवराणा।
तया अंतरी ध्यास रे त्यासि नेणा॥
निवाला स्वये तापसी चंद्रमौळी।
जिवा सोडवी राम हा अंतकाळीं॥८४॥

भजा राम विश्राम योगेश्वरांचा।
जपू नेमिला नेम गौरीहराचा॥
स्वये नीववी तापसी चंद्रमौळी।
तुम्हां सोडवी राम हा अंतकाळीं॥८५॥

मुखी राम विश्राम तेथेचि आहे।
सदानंद आनंद सेवोनि आहे॥
तयावीण तो शीण संदेहकारी।
निजधाम हे नाम शोकापहारी॥८६॥

मुखी राम त्या काम बाधुं शकेना।
गुणे इष्ट धारिष्ट त्याचे चुकेना॥
हरीभक्त तो शक्त कामास भारी।
जगीं धन्य तो मारुती ब्रह्मचारी॥८७॥

बहू चांगले नाम या राघवाचे।
अती साजिरे स्वल्प सोपे फुकाचे॥
करी मूळ निर्मूळ घेता भवाचे।
जिवां मानवां हेंचि कैवल्य साचें॥८८॥

जनीं भोजनी नाम वाचे वदावें।
अती आदरे गद्यघोषे म्हणावे॥
हरीचिंतने अन्न सेवीत जावे।
तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावें॥८९॥ न ये राम वाणी तया थोर हाणी।
जनीं व्यर्थ प्राणी तया नाम कोणी॥
हरीनाम हें वेदशास्त्रीं पुराणीं।
बहू आगळे बोलिली व्यासवाणी॥९०॥

॥जय जय रघुवीर समर्थ ॥

Share this Post